पूर्वसंचित प्रारब्धानुसार भोग कुणालाच चुकले नाहीत. देवाने प्रत्येकाला दु:खाचा ठराविक वाटा दिलेला असतो. हा भोग ज्याने त्याने भोगून संपवावा लागतो. त्यातून कुणाचीच सुटका नसते. प्रत्यक्ष अवतारी पुरषोत्तम प्रभू रामचंद्रांचीही यातून सुटका झालेली नाही. मग सर्व सामान्य माणसाची काय अवस्था ?
भोग भोगायचेच आहेत तर ते निदान सुसह्य होण्यासाठी बुध्दिवादी मनुष्य नेहमीच प्रयत्नशील असतो. हे भोग सुसह्य होण्यासाठी आपल्या पूर्वाचार्यांनी, ॠषीवर्यांनी असंख्य मार्ग सांगितले आहेत. ग्रहपीडा कमी करण्यासाठी आपल्या पूर्वाचार्यांनी खालील उपाय सांगितले आहेत.
१) शुभग्रहांची रत्ने वापरणे, २) इष्ट देवतांची प्रार्थना करणे, ३) ग्रहांचे जप करणे, ४) दानधर्म वा अन्नदान करणे, ५) सत पुरुषाचे दर्शन घेणे, ६) गंगास्नान करणे, ७) शुभमुहुर्त पाहून कार्य करणे, ८) शुभ रंगाचे कपडे वापरणे, ९) शुभ अंक वा शुभांक उपयोगात आणणे, १०) योगासने करणे, ११) मंतरलेले दोरे वा ताईत वापरणे, १२) ग्रहांच्या वनस्पती शरीरावर धारण करणे. इ
या पैकी शुभग्रहांची रत्ने धारण करणे हा एक सोयीचा पर्याय आहे. परंतू खरी रत्ने खूपच महाग असल्याने ती सर्वांनाच परवडतील असे नाही. ब-याचदा खरी रत्ने परवडत नाहीत म्हणून कृत्रिम रत्ने वापरली जातात.याचा कितपत उपयोग होतो याची कल्पना नाही.
हि रत्ने ज्यांना परवडत नाहीत त्यांनी त्या त्या ग्रहंच्या वनस्पती शरीरावर धारण करण्यास आपल्या पूर्वाचार्यांनी सांगितले आहे. या योगे ग्रहपीडा दूर होते. वनस्पती व ग्रह यांचा संबंध खालील प्रमाणे आहे.
१ ) रवी : बेलमूळ
२) चंद्र : खिरणीचे मूळ
३) मंगळ : नागजिव्हा
४) बुध : वरधारा
५) गुरु : भारंगमूळ
६) शुक्र : वाघंटीचे मूळ
७) शनी : वांच्छील
८) राहू : मलय चंदन
९) केतू : अश्वगंधा.
या सर्व वनस्पती काष्टौषधी औषधाच्या दुकानात सहजपणे व सर्वांना परवडेल अशा किंमतीत उपलब्ध होऊ शकतात.
तुमच्या पत्रिकेतील जे ग्रह बलवान असून तुम्हाला अपेक्षीत फल देणार आहेत, त्या ग्रहांचीच रत्ने अथवा वनस्पती धारण करावीत.
अशा वेळी जन्म पत्रिकेत चालू असलेली महादशा – अंतर्दशा यांचाही विचार अवश्यक ठरतो.