Sunday, May 10, 2015

* पंचगव्य * :-

पंचगव्याचे महत्व काय?
पंचगव्य कसे तयार करावे ?
- 'पंच' म्हणजे पाच आणि 'गव्य' म्हणजे गायी  पासून ( देशीगायीपासून ) उत्पन्न होणारे पदार्थ.
ह्यावरून गोमूत्र, गोमय (शेण), गोरस (दूध), गोदधी (दही), गोघृत (तूप)  ह्या पदार्थांच्या
मिश्रणापासून तयार होते ते 'पंचगव्य'होय. कोणत्याही धार्मिक कार्यप्रसंगी शरीर शुध्दि
होण्यासाठी    प्रथम पंचगव्याचे प्राशन करावयाचे असते. ह्याखेरीज, देवप्रतिमेचे  व माळेचे
पवित्रीकरण करताना प्रथम त्यांच्यावर पंचगव्य प्रोक्षण करतात. थोडक्यात, धर्मशात्रदृष्ट्या शुध्दि 
(शुचिता) प्राप्त होण्यासाठी पंचगव्याचे प्राशन किंवा प्रोक्षण करतात.
'यत्त्वगस्थिगतंपापंदेहे
तिष्ठतिमामके|प्राशनात्पंचगव्यस्यदहत्यग्निरिर्वेधनम्||'
अर्थात,
' ज्याप्रमाणे अग्नी इंधन
नष्ट करतो त्याप्रमाणे  देहात व्याधीरूपाने साचून राहिलेले पाप   पंचगव्य प्राशनाने नष्ट होते.'
पंचगव्याचे प्राशन करताना उपरोक्त मंत्राचे पठण करतात. ह्या मंत्रातील'पापम्'हे पद 'व्याधी'
ह्या अर्थी वापरलेले आहे. 'त्वक्' म्हणजे त्वचा. गोमूत्राच्या नित्य मर्दनाने काही त्वचारोग  समूळ
नाहीसे होतात असे आयुर्वेदात सांगितलेले आहे. तसेच काही अस्थिविकारांवर आणि काही
यकृतसंबंधी व्याधींवर   गोमूत्र व गाईचे दूध उपयुक्त ठरते.
पंचगव्याची चिकित्सा करण्यापूर्वी प्रथम  स्वच्छ , शुध्द आणि पवित्र ह्या तीन संकल्पना समजून
घेणे आवश्यक आहे.  वरवर पाहता ह्या तिन्ही शब्दांचे अर्थ समान असल्यासारखे वाटतात. पण
त्यांचा मूलार्थ पाहिल्यास त्यांच्यातील भेद स्पष्ट होतो. एखादा पदार्थ स्वच्छ असला तरी तो शुध्द
व पवित्र असेलच असे नाही. उदा. भेसळयुक्त हळदी सारखा पदार्थ स्वच्छ असला तरी त्याचा
अशुध्द घटकांशी संयोग झालेला असतो. शरीराच्या बाबतीतही ह्या संकल्पना निगडीत आहेत.
शरीराची कितीही स्वच्छता केली तरी त्यात जर व्याधीरूपाने अशुध्दता भरलेली असेल तर ते
अल्पजीवी ठरते. त्याप्रमाणे ते शरीर कितीशी स्वच्छ व शुध्द असले तरी पवित्र नसेल तर त्याचे हवे
तसे सार्थक होऊ शकत नाही. पवित्रता किंवा पावित्र्य हा गुणधर्म वातावरण व मन ह्यांच्याशी
निगडीत असतो. पावित्र्याचा उद्भव संस्कारात असतो. हे संस्कार मातापित्यांपासून तसेच
पूर्वजन्मापासून लाभलेले असतात.
पंचगव्याचा मुख्य उपयोग उपरोक्त लौकिक  अर्थाने समजल्या जाणार्या स्वच्छतेशी नसून
शुध्दतेशी व पावित्र्याशी आहे. शरीरात संस्कारजन्य अपवित्रता किंवा अशुध्दता मुरलेली असेल तर
ती त्वचेपासून अस्थिपर्यंत सर्वत्र व्यापून राहिलेली असते. पंचगव्य प्राशन केल्यामुळे ही अशुध्दता
व अपावित्र्य नष्ट होण्यास मदत होते. कोणत्याही देवताकृत्यापूर्वी पंचगव्य प्राशन करण्यास
सांगितलेले आहे. पूर्व जन्मातील पाप कालांतराने व्याधीरूपाने शरीरात प्रकट होते. त्यांच्या
परिहारासाठी औषधांच्या जोडीला दान, जप, होम व देवताराधन करावे असे शास्त्र सांगते. त्यापैकी
देवताराधन व औषध ह्या दोन्ही गोष्टी पंचगव्याबाबत लागू पडतात.   देवताराधनामध्ये
पंचगव्याचा उपयोग होतो हे सर्वश्रुत आहेच, पण पंचगव्याचा किंवा पंचगव्यातील पृथक पदार्थांचा –
अनेक दुर्धर व्याधींचा उपशम होण्यासाठी - औषध म्हणून देखील उपयोग होतो.    
' मातर:सर्वभूतानांगोषुपाप्मानविद्द्यते|' (महाभारत), 'गोस्तुमात्रानविद्द्यते|' (ऋग्वेद),'सर्वे
देवा:स्थितादेहे|'  (बृहस्पाराशारस्मृति) इत्यादी शास्त्र वचनांवरून गाईचे महत्व सिध्द होते.
भारतीयांना अनादिकालापासून गाईचे महात्म्य विदीत आहेच. पण अगदी अलीकडेच जर्मनी,
अमेरिका, रशिया इत्यादी अतिप्रगत देशांतही गायीपासून ( विशेषत: भारतीय गायीपासून)
मिळणार्या मुत्र, शेण, दूध, दही व तूप इत्यादी पदार्थांवर प्रयोग शाळेत शास्त्रशुध्द संशोधन होऊन
त्यांचे अनन्य साधारण महत्व सिध्द झालेले आहे. निरोगी देशीगायीच्या दुधात कोणतेही दोष
नसल्यामुळे त्या दुधा पासून तयार होणारे दही व तूप  हे पदार्थही शुध्द , पाचक, कृमीनाशक,
बलवर्धक, बुध्दीवर्धक, उत्साहवर्धक असतात. गोमयापासून तयार झालेल्या शेण्यांचे (गोवर्यांचे)
ज्वलन होताना  त्यातून निघणार्या धुरातील वायूच्या विविध   चाचण्या, चिकित्सा व प्रयोग
झालेले असून त्या धूरापासून कोणत्याही प्रकारचे अनिष्ट प्रदूषण  होत नाही; किंबहुना तो धूर
पर्यावरणास उपकारकच असतो असे सिध्द झाले आहे. गोमूत्रातील मूलद्रव्यांची रासायनिक चाचणी
होऊन ती द्रव्ये रोगरोधक, रोगप्रतिकारक, जंतुनाशक व कुजण्याची  क्रिया थांबवणारी असतात
असेही सिध्द झाले आहे. 
शास्त्रोक्त पंचगव्य तयार करण्यासाठी  गोमूत्र एक भाग, गोमय (शेण) अर्धा भाग, गोदुग्ध (दूध)
तीन भाग, गोदधी (दही) दोन भाग, गोघृत (तूप) एक भाग व कुशोदक  (दर्भाचे पाणी) एक भाग
घ्यावे. प्रमाणा साठी संध्येचि पळी घेतल्यास वरीलप्रमाणे सुमारे साडेआठ पळ्या पंचगव्य तयार
होते. सामन्यात: लागणारे पंचगव्य असेच तयार करतात. पंचगव्यासाठी  गर्भवती गाईचे दूध व
दही घेऊ नये. गाय प्रसूत झाल्यावर सुमारे एकवीस दिवसानंतर तिचे दूध उपयोगात आणता येते.
पंचगव्यासाठी लागणारे ताजे गोमूत्र दोन-तीन पदरी तलम वस्त्रातून गाळुन घ्यावे. पंचगव्यासाठी
गायीच्या दुधापासून विरजलेले दही घ्यावे. कुश (दर्भ) शक्यतो ताजे घ्यावेत,अन्यथा संग्रहातील
चालतात.