Sunday, February 14, 2016

!! श्रीनवनाथ भक्तिसार अध्याय १७ - जालंदरनाथ व राजा गोपीचंद यांची भेट !!

💢🍀💢🍀💢🍀💢🍀💢🍀

🌷!! श्रीनवनाथ भक्तिसार कथामृत !!🌷
------------------------------------- 
🍀!! श्रीनवनाथ भक्तिसार अध्याय १७ - जालंदरनाथ व राजा गोपीचंद यांची भेट !!🍀
------------------------------------- 
मैनावतीने कानिफापासून वचन घेऊन गोपीचंदाच्या मनातील भीति नाहीशी केल्यानंतर दुसरे दिवशी प्रातःकाळी गोपीचंद राजा नाथाच्या शिबिरास गेला व पायांवर मस्तक ठेवून हात जोडून उभा राहिला. तेव्हा कानिफाने राजास विचारिले की, तू जालंदरनाथास कोणत्या जागी पुरून टाकिले आहेस ते ठिकाण मला दाखव. मग ती जागा दाखविण्यास राजा तयार झाला व ती जागा पाहून येण्यासाठी नाथाने आपल्या एका शिष्यास त्याच्या बरोबर पाठविले. स्थळ त्या शिष्यास दाखवून राजा परत आल्यानंतर कानिफाने राजास सांगितले की, आता कोणत्या युक्तीने जालंदरमहाराजांस कूपाबाहेर काढितोस ते सांग. हे ऐकून गोपीचंदाने प्रार्थना केली की, महाराज ! या बाबतीत मला काहीच समजत नाही; मी सर्वस्वी तुम्हांस शरण आहे, माता, पिता, गुरु, त्राता, सर्व तुम्ही आहात. मी आपला केवळ सेवक आहे. हा संबंध लक्षात आणून जसे विचारास येईल तसे करावे. असे राजाने अति लीनतेने सांगितल्यानंतर कानिफाने त्यास सुचविले की, राजा, तुझ्या प्राणाचे रक्षण होण्यासाठी मी तुला एक युक्ति सांगतो. प्रथम तू असे कर की, सोने, रुपे, तांबे, पितळ व लोखंड ह्या धातूंचे पाच तुझ्यासारखे पुतळे तयार कर. हे ऐकून राजाने शिपाई पाठवून सोनार, कासार, लोहार अशा उत्तम कारागिरांना बोलावून आणले व त्यास पंचधातू देऊन हुबेहुब आपल्याप्रमाणे प्रतिमा करावयास सांगितले. त्या कारागिरांनी आपली सर्व कला व अक्कल खर्च करून सोन्याचे, रुप्याचे, तांब्याचे, पितळेचे व लोखंडाचे असे गोपीचंद राजाचे पाच पुतळे तयार करून आणिले.

नंतर एक उत्तम दिवस व मुहूर्त व सर्व पुतळे घेऊन राजाबरोबर कानिफनाथ, गुरूस पुरून टाकिले होते तेथे गेला. तेथे आपण काठावर बसून प्रथम सोन्याचा पुतळा मध्यभागी गोपीचंदाकडून ठेवविला. त्या वेळी राजास सांगून ठेविले की, तू कुदळी घेऊन खणावयास लाग आणि जालंदर गुरूने तुला नाव वगैरे विचारताच तू ते सांगून मोठ्या चपळाईने बाहेर नीघ. ते ऐकून राजाने हातात कुदळी घेतली व कानिफाने चिरंजीवप्रयोग सिद्ध करून विभूति राजाच्या कपाळास लाविली. मग राजा मध्यभागी पुतळा ठेवून खाच खणू लागला असता, आतून ध्वनि निघाला की, खांचेवर जो कोण घाव घालीत आहे त्याने आपले नाव लवकर सांगावे. तो शब्द आतून निघाल्यानंतर, 'गोपीचंद राजा आहे, महाराज !' असे म्हणून राजा पटकन बाहेर सरला. गोपीचंद हे नाव ऐकताच जालंदरनाथाचा क्रोधाग्नि भडकून गेला. तो म्हणाला, 'गोपीचंद असेल तर जळून भस्म होऊन जावो.' असे मुखातून शापवचन निघताच, सुवर्णाचा पुतळा तत्काळ जळून गेला. याच पद्धतीने दुसरे चार पुतळे जालंदरनाथाच्या शापाने जळून भस्म होऊन गेले.

शेवटी कानिफाच्या आज्ञेवरून गोपीचंद राजा पुनः खणावयास लागला असता तो आवाज ऐकून जालंदरनाथाने विचार केला की, माझा क्रोधवडवानळ समग्र ब्रह्मांड जाळून टाकणारा असे असता त्रिलोचन राजाचा पुत्र गोपीचंद या सपाट्यातून वाचला, ही मोठी आश्चर्याची गोष्ट आहे ! ह्यावरून परमेश्वर साह्य होऊन तो राजास रक्षीत आहे ह्यात संशय नाही. ह्यास्तव आता राजास अमर करू असा जालंदरनाथाचा विचार ठरून त्याने राजास विचारिले की, अद्यापपावेतो तू खणीत आहेस, तस्मात तू आहेस तरी कोण हे मला सांग. कानिफाने आपले नाव सांगून राजाचे नाव सांगितले आणि तो म्हणाला, गुरुजी ! मी बालक कानिफा आहे. आपला शोध करून या ठिकाणी आलो आहे. माझे डोळे आपल्या चरणांकडे लागले असून ते माझ्या दृष्टीस केव्हा पडतील असे मला झाले आहे म्हणून गोपीचंद राजा खांच उकरून आपल्यास बाहेर काढण्याची तजवीज करीत आहे. ते शिष्याचे भाषण ऐकून आतून ध्वनि उमटला की, गोपीचंद राजा अद्यापपावेतो जिवंत राहिला आहे; तर तो अमर होऊन जगामध्ये वास्तव्य करो !' असा आशीर्वाद देऊन बाहेर काढण्याची आज्ञा केली.

बहुत दिवस खाड्यास झाल्यामुळे जमीन घट्ट होऊन गेली होती. सबब मोठमोठ्याने घाव घालावे लागले तेव्हा आतून शब्द निघाला की, तुम्ही आता खणू नका, स्वस्थ असा ! मग जालंदरनाथाने शक्रास्त्र जपून वज्रास्त्र काढून घेतले; तो माती दोहो बाजूस झाली. नंतर गुरु-शिष्यांची नजरानजर झाली. त्या वेळेस कानिफाचा कंठ सद्गदित होऊन त्याच्या डोळ्यातून आसवे गळू लागली ! मग जालंदरनाथाने आपल्या शिष्यास पोटाशी धरून म्हटले की, या समयी तू येथे होतास म्हणून राजा वाचला. इतक्यात गोपीचंद राजाने जालंदरनाथाच्या पायांवर मस्तक ठेविले. तेव्हा त्याने त्यास कवटाळून धरून त्याच्या मस्तकावर आपला वरदहस्त ठेविला आणि आशीर्वाद दिला की. 'प्रळयाग्नीतून तू आता चंद्र-सूर्य आहेत तोपर्यंत पृथ्वीवर राहा !' मग मैनावतीने पाया पडून सांगितले की महाराज, लोभ्याचा द्रव्यठेवा सांडल्यावर किंवा आंधळ्याची काठी नाहीशी झाल्यावर तो जसा चिंतेत पडून खिन्न होतो, तद्वत अकरा वर्षे माझी दशा झाली होती. याप्रमाणे मैनावती भाषण करीत असता तिच्या नेत्रातून एकसारख्या पाण्याच्या धारा चालल्या होत्या. हे पाहून जालंदरनाथाने आपल्या हातांनी तिचे डोळे पुसून समाधान केले.

नंतर जालंदर गोपीचंदाच्या मुखावरून हात फिरवून त्यास म्हटले की, तुझ्या मनात जे मागावयाचे असेल ते माग, मी देण्यास तयार आहे. राज्यवैभव भोगावयाचे असेल ते माग, मी देण्यास तयार आहे. राज्यवैभव भोगावयाचे असेल तर तसे बोल; योगमार्ग पाहावयाचा असेल तर तसे सांग. मी तुझ्या मर्जीनुरूप मागशील ते देण्यास तयार आहे. मी तुला अमर केले आहे; पण राज्यवैभव चिरकाल राहावयाचे नाही. कारण, हे जेवढे वैभव दिसते आहे तितके सारे नाशिवंत आहे. जसा बोध करून त्यास विचार करण्यास सांगितले.

त्या वेळी गोपीचंद राजाने मनात आणिले की, राज्यवैभव शाश्वत नाही. जालंदरनाथाची योग्यता विलक्षण प्रकारची असून तो चिरंजीव आहे, आज अकरा वर्षेपर्यंत पुरून राहिला असता, जसाच्या तसाच कायम ! ह्याच्यापुढे यमाची प्रतिष्ठा म्हटली म्हणजे खिसमतगाराप्रमाणे हात जोडून पुढे उभे राहण्याची ! ह्याच्यापुढे राजाचीहि काय प्रौढी ! तर आता आपणहि ते अप्रतिम वैराग्यवैभव साध्य करून घ्यावे, हाच उत्कृष्ट विचार होय. असा त्याने मनाचा पुर्ण निग्रह करून जालंदरनाथास सांगितले की, गुरुमहाराज ! पदार्थास अग्नीचा स्पर्श झाल्याने तो जसा अग्निमय होतो, तद्वत आता मला तुमच्यासारखे करून सोडा. हे ऐकताच जालंदरनाथाने त्याची पाठ थोपटून त्यास शाबासकी दिली. मग आपला वरदहस्त त्याच्या मस्तकावर ठेवून कृपादृष्टीने त्याचा सर्व देह अवलोकन केला व कानात मंत्रोपदेश करून त्यास सनाथ केले. त्या वेळी राजास संसारातील सर्व पदार्थ अशाश्वत व नाशिवंत दिसू लागले. मग राजाने वडाचा चीक काढून जटांस लाविला. कौपीन (लंगोटी) परिधान केली, कानात मुद्रा घातल्या, शैलीकंथा अंगावर घेतली. शिंगी वाजविली, कुबडी, फावडी हातात घेऊन नागपंथी म्हणविले. तसेच भस्माची झोळी काखेत व भिक्षेची झोळी हातात घेतली आणि गुरूच्या आज्ञेची वाट पाहात तो उभा राहिला.

गोपीचंद राजा बैरागी झाल्याची बातमी गावातील लोकांस आणि अंतःपुरातील राजस्त्रियांस समजल्यानंतर जिकडे तिकडे सर्वत्र रडारड सुरू झाली. इकडे जालंदरनाथाने राजास तपश्चर्यैस जावयास सांगितले. त्या वेळी त्याने राजास उपदेश केला की, आपल्या अठराशे स्त्रियांकडे भिक्षा मागावयास जा. भिक्षा मागताना शिंगी वाजवावी. माई भिक्षा घाल, असे प्रत्येकीस म्हणावे. अशा रीतीने भिक्षेच्या मिषाने स्त्रियांची भेट घेऊन तपाकरिता निघून जावे.

मग गुरूची आज्ञा शिरसामान्य करून गोपीचंद राजा स्त्रियांकडे भिक्षा मागावयाकरिता निघाला. राजास त्या स्थितीत स्त्रियांच्या दुःखास भरती आली. त्या वेळी त्यांना इतके रडे लोटले की, त्या झालेल्या कल्होळामुळे ब्रह्मांड हलकलून गेले. राजाचे गुण स्वरूप आदिकरून आठवून त्या दुःसह शोक करू लागल्या. मुख्य राणी लुमावती व दुसर्‍या चंपिका, करिती अशा सार्‍या स्त्रियांनी एकीमागून एक जवळ येऊन त्यास गराडा घालून वेढून टाकिले. त्या त्याची प्रार्थना करू लागल्या की ईश्वरसत्तेने जे व्हावयाचे होते ते झाले; पण आता येथेच राहून योगमार्ग चालवा; कोठे तरी दूर जाऊ नका. आम्ही विषयसुखाकरिता आपला छळ करणार नाही. तुमच्या मुखचंद्राकडे पाहून आनंद मानून राहू, हुकूम कराल तेथे पर्णकुटिका बांधून देऊ; तेथे खुशाल रहावे. आम्ही सेवाचाकरी करून आयुष्याचे दिवस सुखाने काढू. स्त्रियांनी त्यास तेथे राहण्याबद्दल फारच आग्रह केला. पण राजाने त्यांच्या भाषणाकडे बिलकुल लक्ष दिले नाही; उलट त्यांचा धिक्कार करून त्यांना दूर जायला सांगितले.

परंतु, मोहपाशाने गोवून टाकिल्यामुळे स्त्रियांना दूर जाववेना. त्या म्हणाल्या, पतिराज, अरण्यात आपणास एकटे राहावे लागेल. तेथे तुमच्याशी गोड गोड गोष्टी कोण करील? तेव्हा शिंगी, कुबडी ह्या मजशी गोष्टी सांगतील, असे राजाने उत्तर दिले. त्यावर पुनः असेच काही प्रश्न केल्यावर राजाने त्यांस सांगितले, जमिनीचे आसन व आकाशाचे पांघरूण मला पुरेल, कुबडी व फावडी या माझ्या दोन्ही बाजूला निजतील. धुनी पेटवून थंडीचे निवारण करीन. व्याघ्रांबरावर वज्रासन घालून बसल्यानंतर शेकडो पुरुष, बायका व मुले तेथे हांजी हांजी करावयास तयार असतील. घरोघर माझी आईबापे, भाऊ-बहिणी असतील, ती मजवर पूर्ण लोभ करतील. कंदमुळाची गोडी षड्रस अन्नाहून विशेष आहे. कौपीन फाटल्यावर इंद्रिय दमनाचा कांसोटा घालीन. जर ही अंगावर असलेली कंथा फाटली तर योग आचरून दिव्य कंथा परिधान करीन. सगुण, निर्गुण या दोन्ही शिंगी व कुबडी कधीच फुटावयाच्या नाहीत. आगम, निगम यांच्या तारा त्यांना बळकट आहेत त्या कदापि तुटावयाच्या नाहीत. कुबडी, फावडी जीर्ण झाल्यानंतर खेचरी, भूचरी या दोन आदेय विदेय ह्या दोन्हीकडे प्रकाशित राहतील व मीहि तन्मय होऊन निरंजनी लक्ष लावून स्वस्थ निजेन. शेवटी मोक्ष, मुक्ति ह्या शैलीचे मी भूषण मिरवीन.

असा बराच संवाद झाल्यावर राजाने भिक्षा घालावयास सांगितली असता, मोहयुक्त होऊन त्या भेटावयास जवळ येऊ लागल्या. ते पाहून राजाने कुबडी, फावडी त्यांना मारावयास उगारिल्या. ते पाहू मैनावती शिजवलेले अन्न घेऊन आली आणि म्हणाली, नाथा, ही भिक्षा घे. मग गोपीचंद भिक्षा झोळीत घेऊन व मातोश्रीच्या पायावर मस्तक ठेवून जालंदरनाथाकडे गेला व झालेला सर्व मजकूर त्यास सांगता झाला. मागाहून मैनावती ताबडतोब आली; तिनेहि तसेच सांगितले. मग तीन दिवसापर्यंत राजास जवळ ठेवून गुरूने त्यास परोपरीने उपदेश केला. शेवटी राजास तप करण्यासाठी बदरिकाश्रमास जाऊन लोखंडाच्या काट्यावर आंगठा ठेवून बारा वर्षे तप करण्याची आज्ञा केली. त्या क्षणीच गोपीचंद तिकडे जावयास निघाला. राजास बोलवावयास कोस दोन कोसपर्यंत कानिफा, जालंदर व प्रधानादि लहानथोर पुष्कळ मंडळी गेली होती. राजाच्या जाण्याने संपूर्ण नगर दुःखसागरात बुडून गेले.

राजास लोमावतीच्या उदरी जन्मलेला एक मुलगा होता, त्याचे नाव मुक्तचंद. त्यास गोपीचंदाच्या राजसिंहासनावर लोकांनी बसविले. त्यास राज्याभिषेक स्वतः जालंदरनाथाने केला आणि प्रधान, सरदार आदिकरून सर्वांना वस्त्रे अलंकार देऊन योग्यतेनुरूप सत्कार केला व त्याचे समाधान केले. मग अंतःपुरात जाऊन सर्व स्त्रियांचे समाधान केले व मुक्तचंद यास गोपीचंदाच्या ठिकाणी मानून समाधानाने राहावयास सांगितले. नंतर कानिफा व त्याचे शिष्या यांसहवर्तमान जालंदर सहा महिनेपर्यंत तेथे राहिला. त्याने आपल्या देखरेखीखाली त्या सर्व राज्याची नीट व्यवस्था लावून दिली.

!! श्रीनवनाथ भक्तीसार अध्याय सतरावा संपूर्ण !!
!! श्रीकृष्णाअर्पणमस्तु !!

♻🌸♻🌸♻🌸♻🌸♻🌸

!! श्रीनवनाथ भक्तिसार अध्याय १६ - कानिफनाथ व गोरक्षनाथांची भेट, कानिफनाथांचे गोपीचंद राजाकडे आगमन !!

💢🍀💢🍀💢🍀💢🍀💢🍀

🌷!! श्रीनवनाथ भक्तिसार कथामृत !!🌷
------------------------------------- 
🍀 !! श्रीनवनाथ भक्तिसार अध्याय १६ - कानिफनाथ व गोरक्षनाथांची भेट, कानिफनाथांचे गोपीचंद राजाकडे आगमन !! 🍀
------------------------------------- 
स्त्रीराज्याच्या राजधानीत मच्छिंद्रनाथाने कानिफनाथास मोठ्या आदरसत्काराने राहवून घेतल्यानंतर त्याची उत्तम बर्दास्त ठेविली. असे करण्यात मच्छिंद्रनाथाचा हेतु असा होता की, कानिफा येथून गेल्यानंतर गोरक्षनाथास भेटेल व तो मजविषयी त्यास बातमी देईल. मग तो मला नेण्यासाठी येथे येईल व मला घेऊन जाईल. असे झाल्यास मी ह्या सर्व सुखास मुकेन; इतक्या पल्ल्यास गोष्ट येऊ नये व त्याचेहि मन रमून त्याने निरंतर येथेच राहावे म्हणून सुम्दर रूपवान देवांना देखील भ्लविणार्‍या अशा स्त्रिया, विषयात गोवून टाकण्याकरिता त्याच्या शिबिरास पाठवू लागला. पण कानिफाने त्या स्त्रियांकडे ढुंकूनसुद्धा पाहिले नाही. कानिफापुढे स्त्रियांचे तेज पडत नाही. त्यांचा हिरमोड होऊन त्या रडत परत येतात, असे वर्तमान मच्छिंद्रनाथास समजल्यावर त्याच्या शिष्यांना विषयात गोवून टाकण्याला सांगितले; पण शिष्यांजवळहि स्त्रियांचे काही चालले नाही. त्या इलाज करून थकल्या, पण त्यांचा हेतु सफळ झाला नाही. महिनाभर राहून कानिफाने मच्छिंद्रनाथापाशी जावयास आज्ञा मागितली; ती त्याने बिनतक्रार दिली. तेव्हा हत्ती, घोडे, पालख्या, उंची वस्त्रे, तंबू राहुट्यादि पुष्कळ देऊन हिरे, माणके, सुवर्ण व पैसा विपुल दिला. अशा मोठ्या लवाजम्यानिशी मच्छिंद्रनाथाने कानिफाची रवानगी करून दिली.

कानिफा तेथून निघून तीर्थयात्रा करीत चालला. तो जेथे जेथे जाई तेथे तेथे त्याचा उत्तम प्रकारे आदरसत्कार होई. पुष्कळ लोक त्याचे शिष्य झाले. जो तो त्याची वाखाणणी करी व मोठ्या हौसेने दूरदूरचे लोक येऊन आपआपल्या गावास मोठ्या सन्मानाने त्यास घेऊन जात. त्याजविषयी लोकांच्या मनात पूज्यबुद्धि उत्पन्न होऊ लागली. अशी त्याची कीर्ति पसरत हेलापट्टणातहि त्याच्या नावाचा डंका बराच गाजला. तेव्हा गोपीचंद राजाने दूत पाठवून नाथाचा समाचार आणविला त्याच्या ऐश्वर्याची दूतांनी राजापाशी फारच स्तुति केली.

इकडे गोरक्षनाथ जगन्नाथहून तीर्थयात्रा करीत फिरत असता त्याची व कानिफाची एका अरण्यात भेट झाली. उभयतांनी आदेश केला. मग कानिफाने गोरक्षास भरजरी गालिच्यावर बसविले. त्या वेळी गोरक्षनाथाची विद्या कशी काय हे पाहावे असे कानिफाच्या मनात येऊन त्याने गोष्ट काढिली की, त्या पलीकडील आम्रवृक्षावर जी मधुर फळे पक्व झालेली दिसत आहेत, त्यातून थोडीशी आणविण्याचे माझ्या मनात आहे. ते ऐकून गोरक्ष म्हणाला, कशाला इतका खटाटोप ! आपल्याला काही गरज नाही. तेव्हा कानिफा म्हणाला, खटपट कशाची आली आहे त्यात? आता शिष्य पाठवून ते आंबे तोडून आणवितो. हे ऐकून गोरक्ष म्हणाला, इतका यत्न करण्याचे काय कारण आहे? आता शिष्य जवळ आहेत म्हणून त्यांच्यापासून आणवाल; पण कोणे वेळेस शिष्य जवळ नसेल तर आपण कसे करावे? आपल्या विद्येच्या प्रभावाने फळे तोडून विद्येचा प्रताप व गुरूचा प्रसाद उजेडास आणावा व फळे खाऊन आत्मा संतुष्ट करावा. तेव्हा कानिफाने सांगितले की, जर अशी तुमची मर्जी आहे, तर मी गुरूच्या कृपेने आता फळे आणितो. असे म्हणून त्याने विभक्तास्त्रमंत्र म्हणून भस्म मंत्रून त्यावर आकर्षणास्त्राची योजना केली व भस्म फेकले; त्यामुळे पिकलेले सर्व आंबे झाडावरून त्याचे जवळ येऊन पडले. मग सर्वांनी ते आंबे खाल्ले व हात धुतल्यानंतर गोरक्षनाथाने मनात विचार केला की, कानिफाने आपले कर्तृत्व तर मला दाखविले. तेव्हा आपणहि ह्यास थोडासा चमत्कार दाखवावा. असा विचार करून कानिफास तो म्हणाला की, तुम्ही माझा पाहूणचार केलात ! आता मी काही फळे आणितो तर ती खाऊन आपण तृप्त व्हावे. कानिफाने त्याचे हे बोलणे मान्य केले. मग गोरक्षनाथाने आकर्षणशक्ति व विभक्तास्त्र जपून भस्म फेकताच एका लवंगवनातील तर्‍हेतर्‍हेची फळे येऊन जवळ पडली. ती मधुर फळे खाऊन सर्व तृप्त झाले.

मग गोरक्षनाथाने मुद्दाम गोष्ट काढिली की, हि शिल्लक राहिलेली फळे पुन्हा परत झाडावर नेऊन डहाळीस चिकटवावी. तेव्हा कानिफा म्हणाला, ही गोष्ट अशक्य होय. त्यावर गोरक्ष म्हणाला, निःसीम गुरुभक्तास काही अवघड नाही. तो दुसरा ब्रह्मदेवहि उत्पन्न करील. अशा प्रकारचे पुष्कळ दृष्टांत देऊन म्हणाला, मी माझ्या सद्गुरूच्या कृपेने पाहिजे ते करीन. हे ऐकून कानिफास राग आला. तो म्हणाला मी तुला व तुझ्या गुरूला जाणतो, तो नरकात पिचत पडला आहे ! स्वतःला योगी असे म्हणवून तो स्त्रीराज्यात रतिविलासात निमग्न होऊन गेला आहे. ब्रह्मदेवाला शक्तिहीन समजून मोठमोठाल्या चढाचढीच्या गोष्टी तू करीत आहेस पण ही सर्व प्रौढी सोडून देऊन मार्गस्थ हो. अशा प्रकारचे उपमर्दाचे पुष्कळ भाषण ऐकून घेतल्यावर गोरक्षनाथ म्हणाला, तू भ्रमिष्टासारखा भाषण करतोस ! तुझा गुरू जालंदरनाथ दीनासारखा आज दहा वर्षे घोड्याच्या लीदीत पडला आहे. सुटुन जाण्याचे त्याच्या अंगी सामर्थ्य नाही म्हणून कुजतो आहे. गौडबंगाल देशात हेलापट्टणच्या गोपीचंद राजाने वस्तादगिरी करून त्यास खाचेत पुरून वर घोड्याची लीद टाकून अगदी बेमालूम करून टाकिले. शाबास त्या राजाची ! माझा गुरु अशा प्रतीचा नव्हे. हे ब्रह्मांड हालवून टाकील असा त्याचा प्रताप आहे. त्याच्या कृपेने तुला आताच चमत्कार दाखवितो पहा. असे म्हणून संजीवनी म्म्त्र म्हणून भस्म फेकताच ती उरलेली फळे जागच्या जागी जाऊन लटकू लागली. ते पाहून कानिफा चकितच झाला. त्याने निराभिमानाने गोरक्षाजवळ जाऊन त्याचि वाहवा केली व प्रेमाने त्यास आलिंगन दिले आणि म्हटले की, आपल्या भाषणाने मला आज एक मोठा फायदा झाला. तो हा क, माझ्या जालंदर गुरूचा शोध लागला. मग गोरक्षनाथ म्हणाला, गोष्ट खरी आहे. माझ्या योगाने जसा तुला तुझ्या गुरूचा शोध लागला, तसा तुझ्या योगाने माझ्या मच्छिद्रनाथ गुरूचाहि मला शोध लागला. आजचा योग फारच उत्तम आला; असे बोलून त्यानी एकमेकास नमस्कार केला. मग गोरक्षनाथ स्त्रीराज्याकडे व कानिफनाथ हेलापट्टणास चालला.

आपला गुरु जालंदरनाथ ह्यास गोपीचंद राजाने पुरून टाकल्याचि बातमी कळताक्षणीच कानिफाच्या मनात क्रोधाग्नि उत्पन्न झाला व केव्हा सूड उगवीन असे त्यास झाले होते. तो आपल्या सातशे शिष्यांसह हेलापट्टणच्या अरण्यात येऊन राहिला. कानिफा आल्याचि बातमी लागताच गोपीचंद राजाने त्यास सामोरे जाण्याचा निश्चय केला. त्याने कानिफाचा लौकिक ऐकलेला होताच, त्यामुळे अंतःकरणापासून त्यास गुरु करण्याचे राजाच्या मनात भरले होते. स्वतःबरोबर हत्ती, घोडे, उंट, पालख्या, गाड्या, तंबू, डेरे, राहुट्या वगैरे घेऊन मोठ्या वैभवाने सातशे शिष्यांसहवर्तमान कानिफानाथ देशपर्यटन करीत होता. कानिफास नगरात आणावयास राजा आपले सातशे सरदान व असंख्य फौजेनिशी मोठ्या दिमाखाने जात असता वाटेमध्ये तो प्रधानास म्हणाला की, प्रारब्धयोगेकरून या नगरास आज महान सिद्धपुरुषाचे पाय लागले आहेत, त्या अर्थी ह्यास गुरु करावा असे माझ्या मनात आले आहे. हा गुरू मला योग्य असाच आहे व माझ्या वैभवाप्रमाणे याचेहि वैभव आहे. नाही तर आमच्या मातोश्रींनी जो गुरु केला तो अगदी कंगाल, घाणेरडा असा होता. मी राजा आहे; माझ्या पंक्तीस बसण्यास राजे लोकच योग्य होत. तो जालंदर पिशाच्च्यासमान भटकणारा घाणेरड्या जागेत राहणारा व दरिद्री असा माझ्या आईने गुरु केला, परंतु कोणतीहि गोष्ट करावयाची ती सारासार विचार करूनच केली पाहिजे. मजसारख्या राजाला गुरु करावयाचा म्हणजे तो असाच ऐश्वर्यवान असला पाहिजे. हा कानिफा मला योग्य गुरु आढळला आहे. असे बोलून राजा मोठ्या समारंभाने कानिफास आणावयास गेला.

कानिफनाथाने गोपीचंद राजास पाहिले मात्र, तोच त्याचा क्रोधरूपी अग्नि भडकून गेला. परंतु विवेक करून त्याने क्रोध आवरून धरिला. त्याने त्या वेळेस असा विचार केला की, जर आपण ह्यास आताच शाप देऊन भस्म करावे, तर आपणास ह्याच्यापासून मोठा कार्यभाग साधून घ्यावयाचा आहे, तो तसाच राहून जाईल. तशात गुरूची कोणत्या ठिकाणी कशी काय अवस्था केली आहे तीहि आपणास पुरी माहीत नाही. यास्तव ह्याच्याकडून गुरूची माहिती करून घेऊन नंतरच ह्यास शिक्षा करावी अशा विचाराने राग आवरून धरून तो अगदी शांत झाला. इतक्यात गोपीचंद राजा अगदी जवळ जाऊन कानिफाच्या पाया पडला नंतर उभा राहून हात जोडून दीनवाणीने विनंती करू लागला की, महाराज ! दैवयोगाने मला अनाथास सनाथ करावयासाठी आपल्या कृपारूपी गंगेचा ओघ आज मजकडे वळला आहे. राजा याप्रमाने बहुत प्रकारे बोलत असता, तिकडे कानिफांचे पूर्ण लक्ष होते. राजाशी सलगी ठेवण्याचा विचार त्याने प्रथम मनात आणलेलाच होता. तशात राजाच्या लीन भाषणाने कानिफास आनंद होऊन त्याने राजाचा हात धरून त्यास आपल्या शेजारी बसविले. मग क्षेमकुशल विचारल्यानंतर त्याने राजास म्हटले की, राजा ! तुझ्या हातून एक मोठे अनुचित कर्म घडले आहे. परंतु तुझे सबळ भाग्य फळास आले म्हणून माझे चित्त शांत झाले; नाही तर ह्या वेळेस मोठा अनर्थ होऊन तुझ्या प्राणावर प्रसंग येऊन ठेपला होता. आता गावात चल, तेथे सर्व वृत्तांत निवेदन करीन.

मग राजा त्यास पालखीत बसवून राजवाड्यास घेऊन गेला. त्याने आज सुवर्णाच्या आसनावर बसविले षोडशोपचारांनी त्याचि यथाविधी पूजा केली. वस्त्रेभूषणे दिली व अनुग्रह करण्यासाठी त्याची विनवणी करू लागला. राजाचे मन वळवून त्यास सर्वस्वी अनुकूल करून घेण्याची खटपट कानिफा करीत होताच. तशात राजा तर अनुग्रह घेऊन उत्सुकतेने चेला होण्यास तयार झालेला पाहून त्यास अतिशय आनंद झाला. तेव्हा कानिफाने राजास म्हटले की, तू माझा अनुग्रह घ्यावया पाहतो आहेस. पण दुधात मीठ घातल्याप्रमाणे तुझ्या हातून एक कर्म घडले आहे, ज्याच्यापासून मी अनुग्रह घेतला आहे, त्या जालंदरनाथास तू घोड्याच्या लीदीत पुरून टाकिले आहेस; परंतु तुझे आयुष्य पुष्कळ व तुझ्या पुण्याईचा जोर बळकट म्हणून माझा कोप शांत झाला. नाही तर जालंदरनाथाने तुला तुझ्या वैभवासुद्धा एका क्षणात भस्म करून टाकिला असता. तेव्हा राजा भयभीत होऊन थरथरा कापू लागला व कानिफाच्या पायांवर मस्तक ठेवून विनंति करू लागला की, महाराज ! मजकडून घडलेल्या अन्यायाची आता मला क्षमा व्हावी आणि या शरण आलेल्या दासावर कृपा करावी. मग तो राजास घेऊन आपल्या शिबिराप्रत गेला.

हा सर्व प्रकार दासींनी मैनावतीस जाऊन कळविला व राजाच्या इतर स्त्रियासहि ती बातमी समजली. हा सर्व मजकूर आम्ही राजदरबारात ऐकिला, म्हणुन मैनावतीच्या दासी म्हणाल्या व त्यांनी दुसरे असेहि मैनावतीस कळविले की, कानिफा या नावाचा जालंदरनाथाचा शिष्य आला असून त्याच्या समागमे गोपीचंद राजा त्याच्या शिबिरात गेला आहे. तेथे कसा काय प्रकार घडेल तो मागाहून कळवू. गोपीचंद राजाने जालंदरास लिदीत पुरल्याचा वृत्तांत ऐकून मैनावतीस राग आला व अतिशय वाईट वाटले. पण पुत्राच्या ममतेस्तव त्यास शासन होऊ नये. असे तिला वाटले.

राजा गोपीचंद तर कानिफाच्या सेवेस हात जोडून हजर राहिला व गुलामासारखा खपू लागला. कानिफाने मागितलेला पदार्थ पाहिजे तेव्हा व लागेल तितका तयार ठेविला; न्यूनता बिलकूल पडू दिली नाही. त्या दिवशी सायंकाळ झाल्यावर नाथाने राजास राजवाड्यात जाण्याची आज्ञा दिली. राजाने राजवाड्यात आल्यावर प्रथम मैनावतीकडे जाऊन तिच्या पाया पडून झालेला साद्यंत वृत्तांत तिला कळविला व आपल्या अपराधाची कानिफाने आपणास क्षमा करावी, म्हणून त्याला युक्तिप्रयुक्तिने सांगून व स्वकार्य साधून घेण्यासाठी मध्यस्थी करण्याची तो मातेला विनंती करू लागला. तिने ते त्याचे म्हणणे ऐकून घेऊन नाथाने जाऊन खटपट करून पाहाण्याचे कबूल केले.

नंतर मैनावती कानिफाच्या शिबिरात गेली व त्याच्या पाया पडून जवळ बसली. मग विचारपूस झाल्यावर मी जालंदरास गुरु केले आहे व आपणास नाथपंथी म्हणवीत आहे, असे तिने त्यास सांगितले. ते ऐकून, आपणहि तोच गुरु केलेला आहे असे कानिफाने सांगून आपल्या गुरूची अशी कशी अवस्था होऊ दिलीस, असे तिला विचारिले. तेव्हा तिने सांगितले की गुरूची पुत्राने अशा रीतीने वाट लाविल्याची बातमी मला आताच कळली. मग तिने आपली मुळारंभापासून सर्व हकीगत त्यास कळविली. शेवटी गोपीचंदाचे अपराध पोटात घालून त्याला पदरात घ्यावे आणि जालंदरनाथाच्या कोपाग्नीत न होरपळू देता, आपल्या पुत्रास निर्भय करावे आणि गुरूस कूपातून काढून या ब्रह्मांडभुवनात आपला कीर्तिध्वज फडकेल असे करावे म्हणून मैनावतीने कानिफास सांगितले. तेव्हा जालंदरनाथाने अनुग्रह करविण्याचे व त्यास निर्भय ठेवण्याचे कानिफाने तिला वचन दिले, मग तिने घरी येऊन पुत्रास झालेला मजकूर सांगितला आणि त्याच्या मनातील भीति समूळ उडविली.

!! श्रीनवनाथ भक्तीसार अध्याय सोळावा संपूर्ण !!
!! श्रीकृष्णाअर्पणमस्तु !!

🍁🍃🍁🍃🍁🍃🍁🍃🍁🍃