Wednesday, April 6, 2016

अध्याय सहावा

अध्याय सहावा

 

गोकर्ण महिमा - महाबळेश्वरलिंग स्थापना

।। ॐ श्री गणेशाय नम: । श्री सरस्वत्यै नम: ।। 
श्री गुरू्भ्यो नम: । श्री कुलदेवतायै नम: ।। 

नामधारक सिद्ध्योग्यांना म्हणाला, "स्वामी, अज्ञानरुपी अंधारात अडकलेल्या मला तुम्ही ज्ञानदीप दाखविलात. तुम्ही मला गुरुपीठही साद्यंत सांगितलेत. आता मला सांगा, श्रीदत्तप्रभूंनी श्रीपादश्रीवल्लभ म्हणून अवतार घेतला.ते तीर्थयात्रेला का गेले ? आणेल तीर्थक्षेत्रे असताना ते गोकर्णाला का गेले ?" नामधारकाने असे विचारले असता सिद्धयोगी म्हणाले, "तुझ्या प्रश्नाने मला खूप आनंद झाला आहे. मी तुला श्रीगुरुचरित्र सविस्तर सांगतो. श्रीदत्तप्रभूंनी श्रीपादश्रीवल्लभ म्हणून अवतार घेतला. त्यांनी भक्तजनांचा उद्धार करण्यासाठी व त्यांना परमार्थाची - आत्मज्ञानाची दीक्षा देण्यासाठीच वेळोवेळी तीर्थयात्रा केली. या भूमीवर अनेक तीर्थक्षेत्रे आहेत, पण या सर्व तीर्थक्षेत्रांत गोकर्ण क्षेत्राचे माहात्म्य फारच मोठे आहे. तेथे 'महाबळेश्वर' नावाचे स्वयंभू शिवलिंग आहे. त्या लिंगाची स्थापना गणेशाने केली. ती कथा मोठी अद्भुत आहे. " सिद्ध्योग्यांनी असे सांगितले असता, "ती महाबळेश्वर लिंगाची कथा मला सविस्तर सांगा." अशी नामधारकाने विनंती केली असता सिद्ध्योग्यांनी कथा सांगण्यास सुरुवात केली.

पुलस्त्य नावाचे एक ब्राम्हण ऋषी होते.त्यांच्या पत्नीचे नाव, कैससी. ती भगवान शंकराची एकनिष्ठ उपासक होती. ती नित्य शिवलिंगाची पूजा केल्याशिवाय अन्न घेत नसे. एके दिवशी तिला पूजेसाठी शिवलिंग मिळाले नाही. व्रतभंग होऊ नये म्हणून मृत्तिकाशिवलिंग करून त्याची भक्तीभावाने पूजा सुरु केली. याचवेळी तिचा पुत्र दशानन रावण तिला वंदन करण्यासाठी तेथे आला होता. तो अत्यंत क्रूर होता, तरी मोठा शिवभक्त होता. आपली आई मृत्तिकाशिवलिंगाची पूजा करीत आहे हे पाहून त्याला मोठे आश्चर्य वाटले. तो म्हणाला, "माते, मी तुझा पुत्र असताना तू मृत्तिका-शिवलिंगाची पूजा करीत आहेस हे माझे मोठे दुर्भाग्यच म्हणावे लागेल आणि या असल्या शिवलिंगाची पूजा करून काय फळ मिळणार आहे ?" कैससी म्हणाली, "या पूजनाने कैलासपदाची प्राप्ती होते." हे ऐकताच रावण म्हणाला, "मी तुला प्रत्यक्ष कैलासच आणून देतो. मग तुला हे कष्टच करावे लागणार नाहीत. तुला प्रत्यक्ष शिवपार्वतीची पूजा करता येईल." असे वाचन देऊन तो शिवपार्वतीसह कैलास आणण्यासाठी मनोवेगाने निघाला. काहीही करून शिवपार्वतीसह कैलास लंकेत आणून आईला द्यायचाच असा निश्चय त्याने केला.

शुभ्र आणि रमणीय अशा त्या कैलास पर्वताला रावण आपल्या वीस हातांनी गदागदा हलवू लागला. कैलास भुवन डळमळू लागले . रावण आपली दहा मस्तके पर्वताला लावून व वीस हात मांड्यांवर ठेवून अत्यंत जोराने पर्वत उचलण्याचा प्रयत्न करू लागला. सप्तपाताळे डळमळू लागली. सप्तस्वर्गात हल्लाकल्लोळ मजला.शेषनाग फडा चुकवू लागला. कूर्म भीतीने थरथरू लागला.स्वर्गासः सर्व देव भयभीत झाले. सत्यलोक, वैकुंठलोक डळमळू लागले. आता प्रलय होणार असे सर्वांना वाटू लागले. घाबरलेली पार्वती शंकराचे पाय धरून म्हणाली." स्वामी, आपल्या कैलासाचे काय होणार? काहीतरी उपाय करा. शिवलोकात मोठा गोंधळ निर्माण झाला आहे. सगळे शिवगण घाबरले आहेत.आता स्वस्थ बसू नका.काहीतरी इलाज करा." पार्वतीने अशी विनंती केली असता शंकर म्हणाले, "तू कसलीही चिंता करू नकोस. माझा भक्त रावण भक्तीने खेळतो आहे." शंकरांनी असे सांगितले तरी पार्वतीचे समाधान झाले नाही. मग शंकरांनी आपल्या डाव्या हाताने शिखरावर दाब दिला. त्यामुळे रावण पार्वतीच्या व जमिनीच्या सांध्यात दडपला गेला.त्यामुळे त्याचे प्राण कासावीस झाले. आता जगतो कि मारतो असे त्याला झाले. त्याने शिवनामाचा घोष सुरु केला. शिवस्तवन करीत, "हे पिनाकपाणि महादेवा, मला वाचवा ! वाचवा ! मी आपणास शरण आलो आहे ! " रावणाने अशी प्रार्थना केली असता शंकरांना त्याची दया आली. त्यांनी डाव्या हाताचा भर काढून घेतला.रावणाची सुटका झाली. त्याने शंकरांचे स्तवन सुरु केले. त्यासाठी त्याने आपले एक मस्तक छाटले. आपली आतडी तोडून तारेप्रमाणे मस्तकाला जोडून तंतुवाद्य तयार केले व त्याच्या साथीने विविध रागात शिवस्तुतीपर गायन केले.त्याने सर्व-प्रथम सामवेदगायन केले. आपल्या गायनातून नवरसांचे भाव प्रकट केले."

इतकी कथा सांगून झाल्यावर सिद्ध्योग्याने नामधारकाला संपूर्ण संगीतशास्त्र समजावून सांगितले. संगीतातील सप्तस्वर, त्यांची स्थाने, कुल, वंश, त्यांचे स्वरूप आणि स्वभाव इत्यान्दींची माहिती दिली. त्याचप्रमाणे संगीतातील आठ गण कोणते तेही सांगितले. त्याचप्रमाणे रावणाने रागदारीत जे गायन केले त्या छत्तीस रागरागिण्यांची नावेही सांगितली. रावणाने छत्तीस रागांत गायन करून भगवान शंकराची अत्यंत भक्तीने आराधना केली असता भोलेनाथ शंकर त्याच्या भक्तीने प्रसन्न झाले. ते पंचवादन व दशभुज अशा स्वरुपात त्याच्यापुढे प्रकट झाले.व म्हणाले ."मी तुझ्यावर प्रसन्न झालो आहे. तुला हवा असेल तो वर मागून घे."

रावण म्हणाला, "महादेव, मला काहीही कमी माही. प्रत्यक्ष लक्ष्मी माझ्या घरी पाणी भरते.ब्रम्हदेव माझा ज्योतिषी आहे. तेहतीस कोटी देव सूर्य, चंद्र, वरूण, वायू माझी अहोरात्र सेवा करीत असतात. अग्नी माझे कपडे धुतो. यम माझ्या आज्ञेशिवाय कुणालाही मारीत नाही. इंद्रजीत माझा पुत्र आहे.अत्यंत बलाढ्य असा कुंभकर्ण माझा भाऊ आहे. माझी लंका नागरी समुद्रात सुरक्षित आहे. माझ्या घरी कामधेनू आहे. मला सहा कोटी वर्षे आयुष्य आहे. त्यामुळे मला माझ्यासाठी काहीही नको आहे.पण माझी आई तुझी भक्त आहे. ती नित्यनेमाने लिंगपूजा करते. तिला तुझी नित्यपूजा करता यावी म्हणून तुझ्यासकट कैलासपर्वतच लंकेला न्यावा या हेतूने मी आलो आहे. परमेश्वरा, माझी एवढी इच्छा पूर्ण कर."

शंकर म्हणाले," तुला कैलास नेण्याची काय गरज? मी माझे प्राणलिंग तुला देतो.हे लिंग माझा प्राण आहे. सर्व मनोरथ पूर्ण करणारे आहे." असे सांगून शंकरांनी रावणाला आत्मलिंग दिले. ते म्हणाले, " या लिंगाची तू तीन वर्षे पूजा लेइस तर तू माझ्यासामान होशील. हे लिंग ज्याच्याजवळ असेल त्याला मृत्यू येणार नाही. याच्या केवळ दर्शनानेच सर्व दोष नाहीसे होतील. मात्र तुझ्या कान्कानागरीत जाईपर्यंत हे लिंग जमिनीवर ठेवू नकोस. या लिंगाची तीन वर्षे पूजा कर म्हणजे तू स्वतः ईश्वर होशील." अशाप्रकारे रावणाला आत्मलिंगाचे माहात्म्य संगन ते रावणाच्या हाती दिले. भगवान शंकरांचे आत्मलिंग मिळाल्याने रावणाला अतिशय आनंद झाला.तो ते लिंग घेऊन लंकेकडे निघाला. त्रिकालज्ञानी त्रैलोक्य-संचारी नारदमुनींना हे समजताच ते धावतच अमरावतीत इंद्राकडे गेले व म्हणाले, "देवराज, घात झाला. सगळे संपले.

आता ! असे अस्वस्थ काय बसले आहात ? अहो, भोलेनाथ शंकरांनी रावणाला आत्मलिंग दिले आहे. "या आत्मलिंगाची तीन वर्षे पूजा केलीस तर तूच ईश्वर होशील. तुझी लंका कैलास होईल. तुला कधीही मृत्यू येणार नाही." असा वरही त्या रावणाल दिला आहे. आता तो रावण अमर होईल. आता त्याच्या तावडीतून कोणीही सुटणार नाही. आता तुमचे वैभव गेले म्हणून समजा. रंभा, उर्वशी, मेनका इत्यांदी अप्सरांसह तुम्हालापण लंकेला जावे लागेल. त्या रावणाची सेवा-चाकरी करावी लागेल.तवर करा त्वरा करा. काहीतरी उपाय करा.तुम्ही आता ब्रम्हदेवाकडे जा. तोच काहीतरी उपाय करील." नारदमुनींनी असे सांगताच भयभीत झालेला इंद्र नारदांना घेऊन ब्रम्हदेवाकडे गेला. सगळी हकीगत समजताच ब्रम्हदेव म्हणाले, "या संकटसमयी विष्णूच काहीतरी उपाय करतील." मग ते वैकुंठलोकात विष्णूकडे गेले.त्यानं सगळी हकीगत सांगून ब्रम्हदेव म्हणाले, " श्रीहरी, रावणाने सर्व देवांना कारागृहात डांबले आहे. आता शंकराचे आत्मलिंग मिळाल्याने तर तो अत्यंत उन्मत्त होईल. त्याचा प्रतिकार करण्यासाठी पुढे तुम्हाला रामावतार घ्यावा लागेलच. परंतु तोपर्यंत, आत्मलिंग मिळाल्याने तो रावण सर्व राक्षसांसह अमर होईल.मग सगळेच कठीण होऊन बसेल.तेव्हा आत्ताच काहीतरी करावयास हवे."

ब्रम्ह्देवानी असे सांगताच भगवान विष्णूंनी कैलासपती शंकराच्याकडे जाऊन त्यांना विचारले, "महादेवा, तुम्ही हे काय करून बसलात? तुम्ही त्या रावणाला आत्मलिंग कशासाठी दिले ? अहो तो क्रूर, दृष्ट रावण आता अमर होईल. त्याने सर्व देवांना तुरुंगात डांबले आहे. तयंची आता सुटका कशी होणार? आता देवत्व त्याच्याकडे जाईल. तो अवघ्या त्रैलोक्याला नकोसे करून टाकेल. शंकर म्हणाले, "श्रीहरी, मी तरी काय करू ? मी आहे साधा-भोळा.त्या रावणाची भक्ती पाहून तय्च्या दोघांचा मला विसरच पडला. त्या रावणाची भक्ती पाहून त्याच्या दोषांचा मला विसरच पडला. टायने स्वतःचे मस्तक तोडून तयार केलेल्या वीणेवर सुस्वर गायन करून माझे अपर स्तवन केले. तयची ती अपर भक्ती पाहून मी संतुष्ट झालो व त्यामा माझे आत्मलिंग दिले. त्याने पार्वती मागितली असती तरीही मी त्याला दिली असती." विष्णू म्हणाले, "महादेवा, तुम्ही असले वर देता, त्यामुळे दैत्य उन्मत्त होतात. ते सर्वांचा छळ करतात.मग तयंचा नाश करण्यासाठी, संतसज्जनांचे रक्षण करण्यासाठी आम्हाला अवतार घ्यावे लागतात.आता झाले ते झाले, आता सांगा, तो रावण आत्मलिंग घेऊन त्याला किती वेळ झाला?" शंकर म्हणाले, "फार तर पाच घटका झाल्या असतील. अद्याप तो लंकेत गेला नसेल.तो म्र्गातच कोठेतरी असेल. त्याला मी आत्मलिंग जमिनीवर ठेवू नकोस असे बजाविले आहे."शंकरांनी असे सांगताच विष्णूंनी आपले सुदर्शन चक्र सूर्याला झाकण्यासाठी पाठविले.मग ते नारदमुनींना म्हणाले, "मुनिवर्य, रावण लंकेकडे निघाला आहे. तुम्ही त्वरा करा, त्याच्याकडे जा व काहीही करून त्याला रोखून धरा.माझे सुदर्शन चक्र सूर्याला झाकून सूर्यास्त झाल्याचा आबाह्स निर्माण होईल. रावण नित्यनेमाने संध्यावंदन करतो, हे तुम्हाला माहित आहे. त्याला गाठून त्याला विलंब होईल असा काहीतरी प्रयत्न करा." विष्णूंनी असे सांगितले असता नारदमुनी मनोवेगे निघाले.

नारदमुनी गेल्यावर विष्णू गणेशाला म्हणाले,"गणेशा, तू विघ्नहर्ता, दुःखहर्ता आहेस, म्हणून तर सर्व देवसुद्धा तुला वंदन करतात. तुला जे वंदन करतात तयंचे मनोरथ सिद्धीला जातात; परंतु जे लोक तुला वंदन करीत नाही, तुझी उपेक्षा करतात, त्यांच्यावर अनेक संकटे येतात; पण रावण तुला मुळीच जुमानत नाही.तो तुझ्या नकळत शंकराचे आत्मलिंग घेऊन गेला आहे. आता त्या आत्म्लीन्गामुळे तो अमर होईल व सर्व जगाचा छळ करील. तो लंकेत जाण्यापूर्वीच त्याला रोखून धरले पाहिजे. ते आत्मलिंग कधीही जमिनीवर ठेवू नकोस असे शंकरांनी त्यांला बजाविले आहे.त्याचाच फायदा करून घ्यावयास हवा. जेणेकरून रावण लौकर लंकेस जाणार नाही अशी व्यवस्था करण्यासाठी नारदांना पुढे पाठविले आहे. आता तू बाल-ब्रम्हचाऱ्याचे रूप धारण करून रावणाकडे जा व त्याचा विश्वास संपादन करून ते आत्मलिंग मिळव व ते जमिनीवर ठेव. असे केल्यास ते लिंग तेथेच कायम राहील." अशाप्रकारे विष्णूंनी गणेशाला पढवून तयार केले. गणेशाने ते मान्य केले. टायने बालब्रम्हचाऱ्याचे रूप धारण केले.भगवान विष्णूंनी त्याला शिदोरी म्हणून गूळ, खोबरे, साखर, लाडू, डाळींबे इत्यादी पदार्थ दिले. मग गणेश ते पदार्थ खात खात रावणाकडे निघाला.नारदमुनी अगोदरच रावणाकडे गेले होते. त्यांनी रावणाला गाठून विचारले."रावणा, कोठून आलास ?" रावण म्हणाला, "मी कैलासावर गेलो होतो.तेथे मी कठोर तप केले.त्यामुळे प्रसन्न झालेल्या शंकरांनी मला आत्मलिंग दिले. या आत्मलिंगाचे माहात्म्य फार मोठे आहे असे त्यांनी सांगितले." नारदमुनी म्हणाले,"रावणा, तू खरोखरच मोठा भाग्यवान आहेस म्हणूनच तुला आत्मलिंग दिले.मला त्या लिंगाची बरीच माहिती आहे.

मला ते दाखव.म्हणजे ते शंकराचेच आत्मलिंग आहे अशी माझी खात्री पटेल." नारदांच्या बोलण्यावर रावणाचा विश्वास नव्हता. त्याने ते आत्मलिंग दुरूनच दाखविले. ते लिंग पाहून नारदमुनी म्हणाले, "लंकेशा, हेच ते आत्मलिंग.मला त्याचे माहात्म्य चांगले माहित आहे. मी तुला ते सविस्तर सांगतो. तू अगदी शांत बसून मी सांगतो ते लक्षपूर्वक ऐक. मी तुला या लिंगाची उत्पत्ती कशी झाली ते सांगतो. कालाग्नीसारखा एक महाकाय पशु होता. त्या पशुला तीन शिंगे होती. एकदा ब्रम्हा-विष्णू-महेश शिकारीसाठी गेले होते.त्यांनी त्या पशूची शिकार केली. त्यांनी त्या पशूची तिन्ही शिंगे काढली. त्या प्रत्येक शिंगाखाली एकेक प्राणलिंग होते. ती तिन्ही लिंगे त्या तिघांनी घेतली. तू जे आत्मलिंग दाखविलेस तेच शंकरांना मिळाले होते. जो या लिंगाची तीन वर्षे पूजा करील तो स्वतः ईश्वर होईल. तो वरदाता होईल.हे लिंग ज्या स्थानी असेल ते स्थान कैलास होईल. या लिंगाचे आणखीही मोठे माहात्म्य आहे. "नारदांनी वेळ काढण्यासाठी आणखी काही सांगावयास सुरुवात केली, तेवह रावण म्हणाला, "पुरे पुरे. मला लौकर लंकेत गेले पाहिजे." असे बोलून तो जाऊ लागला तेव्हा नारद म्हणाले, " सूर्यास्त होण्याची वेळ आली आहे.तू चार वेदांचे अध्ययन केले आहेस.ब्राम्हणाने सायंसंध्यावंदन केलेच पाहिजे. तू जर असाच गेलास तर संध्याकाळ होईल. संध्येची वेळ चुकवत कामा नये. कितीही असले तरी संध्यावान्दानाचा नियम मोडता कामा नये.आता माझीही संध्येची वेळ झाली आहे. मी जातो" असे बोलून नारदमुनी निघून गेले. इकडे सुदर्शन चक्र सुर्याआड झाल्यामुळे संध्याकाळ झाल्याचा आभास निर्माण झाला. रावण मोठ्या काळजीत पडला. आता काय करायचे? संध्याकाळ तर झाली. आता संध्या न करताच पुढे गेलो तर व्रतभंग होणार. संध्या करावयास बसलो तर या आत्मलिंगाचे काय करायचे ? काही झाले तरी आत्मलिंग जमिनीवर ठेवू नकोस असे शंकरांनी बजावून सांगितले आहे. आता काय करावे? अशा काळजीत तो पडला होता. त्यावेळी त्याला एक बालब्रम्हचारी दिसला. तो फुले, समिधा गोल करीत होता.रावणाने विचार केला, "बालब्रम्हचारी अगदी साधा-भोळा दिसतो आहे. हा काही झाले तरी आपला विश्वासघात करणार नाही. आपले संध्यावंदन होईपर्यंत हे आत्मलिंग त्याच्या हाती द्यावे." असा विचार करून रावणाने त्या बाल्ब्राम्हचाऱ्याला हाक मारली.

रावणाने त्या बाल्ब्राम्हचाऱ्याला हाक मारली, पण रावणाला पाहताच तो पळू लागला. रावणाने त्याला थांबवून प्रेमाने अरे विचारले," अरे बटू, घाबरू नकोस.तू कोण रे बाळा ? तुझे आई वाडील कोण? तू कोठे राहतोस ? तू कोणत्या कुळातला ? मला सगळे काही सांग."

रावणाने अशी विचारपूस सुरु केली असता बाल्ब्राम्हचाऱ्याच्या रुपात असलेला गणेश म्हणाला, "अहो, माझी एवढी चौकशी कशासाठी करीत आहात? माझ्या पित्याने तुमच्याकडून काही कर्ज वगैरे घेतले आहे काय ? माझा पिता जटाधारी आहे. तो सर्वांगाला भस्म लावतो. त्याच्या गळ्यात रुद्राक्षमाळा असतात.तो वृषभावर बसून भिक्षा मागत फिरतो.टायचे नाव शंकर. माझी मत प्रत्यक्ष जगन्माता आहे. आता मला जाऊ दे, मला तुझी फार भीती वाटते." रावण म्हणाला, "अरे बाळा, तुझे वडील तर अगदी गरीब दिसतात,घरोघरी भिक्षा मागतात, मग ते तुला कुठले सुख देणार ? माझे लंका नगर रत्नखचित आहे. तू माझ्याबरोबर चल. माझ्या घरी देवपूजा कर. तुला हवे असेल ते मी देईन, " बालब्रम्हचारी म्हणाला, "नको, नको. तुझ्या लंकेत राक्षस आहेत. मला ते मारून टाकतील. मला सोड मी आपला माझ्या घरी जातो. मला खूप भूक लागली आहे."रावण म्हणाला, "ठीक आहे. तू खुशाल आपल्या घरी जा, पण थोडा वे थांब. मी समुद्रतीरावर संध्या करून येतो, तोपर्यंत हे लिंग हातात धरून ठेव; पण काही झाले तरी जमिनीवर ठेवू नकोस." त्यावर बालब्रम्हचारी म्हणाला," अहो, मला हा त्रास का देत आहात ? मी लहान आहे, तुमचे लिंग जड असेल. मला कसे धरत येईल ?" रावणाने त्याला परोपरीने समजाविले व लिंग हातात धरून ठेवण्यास तयार केले. रावण तय्च्या हाती लिंग देऊन समुद्राच्या काठावर संद्येला बसला. तेव्हा तो बाल्ब्राम्हचारी म्हाणाला,"ठीक आहे. मी तुम्हाला तीन हाका मारीन. तेवढ्यात तुम्ही आला नाहीत तर मी हे लिंग जमिनीवर ठेवीन." रावणाने ते मान्य केले. तो बाल्ब्राम्हचारी म्हणजे गणेश हातात आत्मलिंग घेऊन उभा राहीला. रावण संध्येला बसला. सर्व देव विअमनत बसून गणेशाकडे कौतुकाने पाहत होते. रावण अर्ध्य देऊ लागला, तेव्हा गणेश रावणाला हाका मारीत म्हणाला, "लौकर या. माझ्या हाताला हे लिंग पेलवत नव्हती. माझा हात दुखावला आहे."

रावणाने हाताने खून करून थोडा वेळ थांबण्यास सांगितले. काही वेळानंतर गणेशाने पुन्हा दोन हाक मारल्या;पण रावण संध्या अर्धवट सोडून उठला नाही. आता अट पूर्ण झाली होती.मग गणेशाने भगवान विष्णूंचे स्मरण करून व सर्व देवांना साक्षी ठेवून ते आत्मलिंग जमिनीवर ठेवले. सर्व देवांना अतिशय आनंद झाला. त्यांनी आकाशातून गणेशावर पृष्पवृष्टी केली. अर्ध्य देऊन रावण वेगाने परत आला. गणेशाने आत्मलिंग जमिनीवर ठेवलेले पाहून तो अतिशय क्रुद्ध झाला. त्याने रागाच्या भारत ठोसे मारले. गणेश रडत रडत पण मनातल्या मनात हसत हसत म्हणाला," मला विनाकारण का मारता ? मी आता माझ्या वडिलांना तुमचे नाव सांगतो." असे बोलून तो रडत रडत निघून गेला.

मग रावणाने सारी शक्ती एकटवून ते लिंग वर काढण्याचा प्रयत्न केला; पण टायचा काहीही उपयोग झाला नाही. रावणाने ते आत्मलिंग वर काढण्यासाठी जोर लावल्याने त्या आत्म्लीन्गाला पीळ बसला.ते गो-कर्ण म्हणजे गाईच्या कानाच्या आकारासारखे झाले; पण ते जमिनीच्या बाहेर आले नाही. तेव्हापासून ते शिवलिंग गोकर्ण महाबळेश्वर या नावाने प्रसिद्ध झाले. हताश, निराश झालेला रावण स्वतःचे कपाळ बडवीत लंकेला निघून गेला. भगवान सदशिवन्नॆ वास्तव्य केले म्हणून सर्व देवही तेथे येउन राहू लागले. ही कथा सांगून सिद्धयोगी नामधारकाला म्हणाले, "या गोकर्ण महाबळेश्वराचे माहात्म्य स्कांद्पुरणात अधिक विस्ताराने सांगितले आहे. ही कथा ऐकून नामधारकाला अतिशय आनंद झाला. त्याने सिद्धांचे पाय धरले. असे सरस्वती गंगाधर सांगतात.

अशारीतीने श्रीगुरुचारित्रामृतातील 'गोकर्ण महिमा - महाबळेश्वरलिंग स्थापना' नावाचा अध्याय सहावा समाप्त.

॥श्रीगुरुदत्तात्रेयार्पणमस्तु॥

अध्याय पाचवा

अध्याय पाचवा

 

श्रीदत्तात्रेयांचा श्रीपादश्रीवल्लभ अवतार कथा

।। ॐ श्री गणेशाय नम: । श्री सरस्वत्यै नम: ।। 
श्री गुरू्भ्यो नम: । श्री कुलदेवतायै नम: ।। 

सिद्धयोगी नामधारकाला श्रीदत्तात्रेयांची अवतार कथा सांगू लागले. आपल्या भक्तजनांचे रक्षण करण्यासाठी परमेश्वराने या मनुष्यलोकात अनेक अवतार धारण केले. सिद्धयोगी नामधारकाला म्हणाले, "अरे नामधारका, लक्षपूर्वक ऐक. भगवान विष्णूंनी अंबरीषासाठी अवतार घेतला, त्याप्रमाणे लोकांचा उद्धार करण्यासाठी श्रीदत्तप्रभूंनी अनेक अवतार घेतले. मत्स्य, कूर्म, वराह, नृसिंह, वामन, परशुराम, श्रीराम, श्रीकृष्ण, बौद्ध, कल्की असे श्रीविष्णूचे दहा अवतार आहेत. संतसज्जनांचे रक्षण व दृष्ट्दुर्जनांचे निर्दोलन याच हेतूंनी परमेश्वर नानारूपांनी अवतार घेतो. द्वापरयुग संपल्यावर कलियुग सुरु झाले. जगात अधर्म आणि अनाचार वाढला. ब्राम्हण आचारभ्रष्ट, विचारभ्रष्ट झाले. भगीरथाने आपल्या पूर्वजांच्या उद्धारासाठी गंगा पृथ्वीवर आणली. त्याप्रमाणे लोकांच्या उद्धारासाठी परमेश्वर मनुष्यरुपात अवतार घेतो.

पीठापूर नावाच्या गावात आपळराज नावाचा एक आपस्तंभ शाखेचा ब्राम्हण होता. त्याच्या धर्मपत्नीचे नाव सुमती. ती मोठी सदाचरणी व पतिव्रता होती. अतिथी-अभ्यान्गताची ती मनोभावे सेवा करीत असे.दोघेही सत्वगुणी होते.ती श्रीविष्णूची आराधना-उपासना करीत असे. एके दिवशी मध्यान्हकाळी श्रीदत्तात्रेय अतिथीवेषात तिच्या घरी भिक्षेसाठी आले. त्या दिवशी अमावस्या होती. त्या दिवशी तिच्या घरी श्राद्ध होते. श्राद्धासाठी बोलाविलेले ब्राम्हण अद्याप यावयाचे होते. दारी आलेला अतिथी आलेला आहे हे पाहून सुमतीने त्या अतिथीचे स्वागत करुं त्याला श्राद्धासाठी जो स्वयंपाक तयार केला होता त्याची भिक्षा वाढली. त्यामुळे प्रसन्न झालेल्या अतिथीवेषातील श्रीदत्तात्रेयांनी तीन शिरे, सहा हात अशा स्वरुपात दर्शन दिले. आज आपल्या घरी प्रत्यक्ष श्रीदत्तप्रभू जेवले हे पाहून सुमतीला अतिशय आनंद झाला. तिमे श्रीदत्तात्रेयांना साष्टांग नमस्कार घातला.प्रसन्न झालेले श्रीदत्तात्रेय तिला म्हणाले, 

"माग माते जे इच्छिसी । जे जे वासना तुझे मन पावसी । पावसी त्वरित म्हणतसे ।।
"माते, मी तुझ्यावर प्रसन्न झालो आहे. तुला जे हवे असेल ते माग." श्रीदत्तात्रेयांनी असे आश्वासन दिले असता सुमती अत्यंत विनम्रपणे भगवान दत्त्प्रभूंना म्हणाली, "भगवंता, आपण मला 'जननी' म्हणालात तेव्हा ते नाव सार्थ करावे. माझ्या पोटी आपण जन्म घ्यावा.मला पुष्कळ पुत्र झाले, परंतु ते जगले नाहीत. त्यातून दोन पुत्र वाचले आहेत, पण त्यातील एक आंधळा आहे व दुसरा पांगळा आहे. ते असून नसल्यासारखे आहेत, म्हणून मला आपल्यासारखा विश्ववंद्य, परमज्ञानी, देवस्वरूप असा पुत्र व्हवा."

सुमतीने अशी प्रार्थना केली असता प्रसन्न झालेले श्रीदत्त्प्रभू पुढील धर्मकार्याचे स्मरण होऊन तिला म्हणाले, "माते, तुला मोठा तपस्वी पुत्र होईल. तुझ्या वंशाचा उद्धार करील. कलियुगात त्याची फार मोठी कीर्ती होईल. परंतु तुम्ही जो सांगेल तसे करा. नाहीतर, तो तुमच्याजवळ राहणार नाही. तुमचे सगळे दैन्य-दुःख दूर नाहीसे करेल." असा सूचक आशीर्वाद देऊन अतिथीरुपी श्रीदत्तात्रेय अदुष्य झाले. हे वरदान ऐकून सुमतीला अतिशय आनंद झाला.

काही कामासाठी बाहेर गेलेला आपळराजा घरी परतला. सुमतीने त्याला सगळी हकीगत सांगितली. मध्यानकाळी कोणी अतिथी आल्यास त्यला भिक्षा घालण्यास चुकू नको असेही श्रीदत्तात्रेयांनी सांगितले होते. त्याचप्रमाणे माहूर, करवीर, पांचाळेश्वर या ठिकाणी श्रीदत्तात्रेयांचा निवास असतो आणि जे कोणी भिक्षा मागावयास येईल त्याला श्रीदत्तप्रभू मानून भिक्षा घालावी असेही त्यांनी सांगितले होते. सुमतीने सांगितलेली हकीगत ऐकून आपळराजा अतिशय आनंदित झाला. तो सुमतीला म्हणाला, "तू अगदी योग्य तेच केलेस. आज श्राद्ध खऱ्या अर्थाने सफल झाले. माझे पितर आज एकाच भिक्षेने तृप्त झाले. कारण आज आपल्याकडे श्रीदत्तरुपी प्रत्यक्ष विष्णूच आले होते. हे सुमती, तुझे मातापिता खरोखर धन्य आहेत. तुला जो वर मिळाला तसाच पुत्र तुला होईल.

पुढे यथाकाली सुमती गर्भवती झाली. नवमास पूर्ण झाल्यावर एका शुभदिवशी (भाद्रपद शुक्ल चतुर्थी) सुमती प्रसूत झाली. तिअल एक पुत्र झाला. त्याचे जातकर्म करण्यात आले. आपळराजाने खुप दानधर्म केला. विद्वान ब्राम्हणांनी त्याची जन्मपत्रिका तयार करून त्याचे भविष्य वर्तवले. 'हा मुलगा दीक्षाकर्ता जगद्गुरु होईल.' असे त्याचे भविष्य सांगितले. भगवान दत्तात्रेयांनी वर दिल्याप्रमाणे हा मुलगा झाला हे ध्य्नात घेऊन त्या नवजात बालकाचे नाव 'श्रीपाद' असे ठेवले. हे भगवान दत्तात्रेय असून लोकोद्धारासाठी अवतीर्ण झाले आहेत हे आपळराजा व सुमती यांने समजले. अत्यंत आनंदाने ते श्रीपादाचे संगोपन करीत होते.

यथावकाश श्रीपाद सात वर्षांचा झाला. मग आपाळराजाने त्याचे यथाशास्त्र मौजीबंधन केले. मुंज होताच श्रीपाद चारही वेद म्हणू लागला. तो न्याय, मीमांसा, तर्क इत्यादी दर्शनशास्त्रांत पारंगत झाला. त्यावर भाष्य करू लागला. आचारधर्म, व्यवहारधर्म, प्रायश्चित्ते, वेदांत इत्यादींचे ज्ञान तो लोकांना समजावून देऊ लागला. श्रीपादाची असामान्य बुद्धिमत्ता पाहून लोक आश्चर्याने थक्क झाले. त्याच्या मुखातून ज्ञान श्रवण करण्यासाठी आणेल लोक पीठापुरास येऊ लागले.

श्रीपाद सोळा वर्षांचे झाले. माता-पित्यांनी श्रीपादांच्या विवाहाबद्दल चर्चा सुरु केली. त्यांनी श्रीपादांना विवाहाविषयी विचारले, त्यावेळी ते म्हणाले, "मी विवाह करणार नाही.मी वैराग्य स्त्रीशी विवाह केला आहे.मी तापसी ब्रम्हचारी, योगश्री हीच आमची पत्नी होय.माझे नावच श्रीवल्लभ आहे. मी आता तप करण्यासाठी हिमालयात जाणार आहे." हे ऐकून आई-वडिलांना खूप वाईट वाटले. परंतु 'तुला ज्ञानी पुत्र होईल.तो सांगेल तसे वागा.' हे श्रीदत्तप्रभूंचे शब्द सुमतीला आठवले. या मुलाचा शब्द आपण मोडला तर काहीतरी विपरीत होईल तेव्हा याला अडवून चालणार नाही. असा विचार करून आई-वडील त्यांना म्हणाले, "बाळा, तू आमच्या म्हातारपणी आमचा सांभाळ करशील अशी आम्हाला आशा होती. पण आम्ही तुला अडवीत नाही." आपल्याला पुत्रवियोग होणार या विचाराने सुमती दुःख करू लागली. तेव्हा श्रीपाद तिला समजावीत म्हणाले, "तुम्ही कसलीही चिंता करू नका. तुम्हाला हवे असेल ते मिळेल." मग त्यांनी आपल्या आंधळ्या व पांगळ्या बंधूंकडे अमृतदृष्टीने पहिले . आणि त्याचक्षणी परिस्पर्शाने लोखंडाचे सोने होते त्याप्रमाणे त्या दोघा भावांना दिव्य देह प्राप्ती झाली. आंधळ्याला दृष्टी आली व पांगळ्याला पाय आले. त्या दोघांनी श्रीपादांच्या चरणकमलांवर डोके ठेवले. 'आम्ही आज कृतार्थ झालो, धन्य झालो.' असे ते म्हणाले. श्रीपादांनी त्यांच्या मस्तकावर वरदहस्त ठेवून आशीर्वाद दिला.

"तुम्हाला पुत्रपौत्रांसह सर्वप्रकारची सुखसमृद्धी प्राप्त होईल . तुम्हाला दीर्घायुष्य प्राप्त होईल. तुम्ही चिरकाल सुखाने नांदाल. तुम्ही आई-वडिलांची सेवा करा. तुम्ही परमज्ञानी व्हाल. शेवटी तुम्हाला मोक्ष प्राप्त होईल." मग ते आई-वडिलांना म्हणाले, "या दोन्ही मुलांच्या सहवासात राहून तुम्ही शतायुषी व्हाल. आता मला परवानगी द्या. मी उत्तरदिशेला जात आहे. अनेक साधुनानांना मी दीक्षा देणार आहे."

सर्वजण श्रीपादांच्या पाया पडले. श्रीपाद श्रीवल्लभ घरातून बाहेर पडले एकेकी गुप्त झाले. ते एका गुप्तपणे काशीक्षेत्री गेले. तेथून बदरिकाश्रमात गेले. तेथे श्रीनारायणाचे दर्शन घेऊन आपण लोकोद्धार करण्यासठी भूलोकी अवतार घेतला आहे. " असे सांगून गोकर्णक्षेत्रात आले.

श्रोते हो ! सिद्ध्योग्यांनी सांगितलेली कथा ऐकून आनंदित झालेल्या नामधारकाने सिद्ध्योग्यांना काय विचारले व सिद्ध्योग्यांनी काय सांगितले ती कथा पुढील अध्यायात ऐका.

अशारीतीने श्रीगुरुचारित्रामृतातील 'श्रीदत्तात्रेयांचा श्रीपादश्रीवल्लभ अवतार कथा' नावाचा अध्याय पाचवा समाप्त.

॥श्रीगुरुदत्तात्रेयार्पणमस्तु॥